शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संगमनेर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ची एक महत्त्वपूर्ण बैठक तालुकाध्यक्ष मा. आशिषभाऊ शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा योग्य वाटा मिळावा अशी जोरदार मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने महायुतीकडून जिल्हा परिषदेची एक जागा, पंचायत समितीच्या दोन जागा आणि नगरपालिकेच्या चार जागा मिळाव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.
या बैठकीतील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, घुलेवाडी गणातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे तालुकाध्यक्ष मा. आशिष भाऊ शेळके यांना उमेदवारी मिळावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या कामाला तातडीने लागण्याच्या सूचना अध्यक्ष आशिष शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तर आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहराध्यक्ष कैलास कासार यांनी बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. ही बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) साठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे पक्षाची भूमिका आणि रणनीती स्पष्ट झाली आहे.